"किती जगलो यापेक्षा कसे जगलो हे फार महत्वाचं असतं आणि त्यावरच माणसाचं मोठेपण ठरतं."
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची महानता मोठी आहे आणि ही महानता जपण्याची नैतिक जबाबदारी शांतिनिकेतन लोकविद्यापीठानं पार पाडली आहे.
३५ एकर जागेवर वसलेल्या हिरव्यागार शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरात कोणत्याही जाती-धर्माचं मंदिर नाही. आहे तो फक्त क्रांतीस्मृती स्तंभ! ९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींजींनी ब्रिटिशांना 'चले जाव' असा आदेश दिला आणि अवघा देश रस्त्यावर उतरला.
सांगली-सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून जवळपास ५ हजार १६० स्वातंत्र्यसैनिकांनी या लढ्यात भाग घेतला. ९३ स्वातंत्र्यसैनिकांनी हौतात्म्य पत्करले. ही देशभक्तीची भावना नव्या पिढीत जोपासली जावी यासाठी हयात असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनी 'स्वातंत्र्य संग्राम संस्था' स्थापन केली व नवभारत शिक्षण मंडळ सलग्नीत सर्व शाखांनी या स्तंभाची उभारणी केली.
...आणि परिसरातील तब्बल ५ हजारांहून अधिक स्वातंत्र्यसैनिक या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होते.